जळगाव जिल्ह्यात ८ नवीन ग्रामपंचायतींना शासन मान्यता, विकासाला वेग

 नवं दृष्टी न्यूज 


जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल होत असून, राज्य शासनाने आठ नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची एकूण संख्या ११६० वरून वाढून ११६८ झाली आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीमुळे आणि वाढलेल्या अधिकारांमुळे अनेक गावांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर शासनाने ग्रामपंचायत स्थापनेच्या अटींमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. पूर्वी किमान १००० लोकसंख्या आवश्यक होती, ती आता ७०० पर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच, गाव व तांड्यामधील ३ किमी अंतराची अटही हटवण्यात आली आहे, त्यामुळे लहान वस्त्या व तांड्यांना स्वतंत्र ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सुधारित निकषांनुसार जिल्ह्यातून एकूण ४२ प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी निकष पूर्ण करणाऱ्या ८ प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे.


नव्या ग्रामपंचायतींमध्ये चाळीसगाव तालुक्यातील ५, जामनेर तालुक्यातील २ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील १ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. बोरखेडा येथून बोरखेडासीम, गोद्री येथून सुकानाईक तांडा, देऊळगाव गुजरीतून पळासखेडा काकर, वरखेडे बु. मधून दीपनगर, वलठाणमधून वलठाण तांडा, खेरडे येथून सोनगाव आणि कोंदगावमधून गणपूर या नव्या ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ भाऊसाहेब अकलाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूर झालेल्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे दुर्गम भागातील तांड्यांच्या विकासाला चालना मिळणार असून, केंद्र व राज्य शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होणार आहे. परिणामी, स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होऊन ग्रामीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी